संस्कारधन आणि मी

' शुभंकरोती कल्याणम् आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय दिपोज्योती नमोस्तूते '

तिन्हीसांजा झाल्या की गावाकडे वडीलधाऱ्या मंडळींची आणि घरातील स्त्रियांची देवाजवळ दिवा लावण्याची लगबग सुरू होते. देवासमोर निरांजन लावून सर्वांनी एकत्र बसून शुभंकरोती म्हणणे हा एक नियमच होता. अर्थात त्यामागे खूप सुंदर अर्थ होता. तिन्हीसांज ही अशी वेळ आहे की त्यावेळी श्री लक्ष्मीचा संचार असतो. अशा वेळी तिची आराधना आणि चिंतन करणारी घरे दिसली की तिचा वरदहस्त कायम त्या घरावर राहतो.

लहान मुले ही खूपच संवेदनशील आणि अनुकरण करणारी असतात. त्यांच्यात आकलनशक्ती आणि पाठांतर करण्याची क्षमता तुलनेने मोठ्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे लहान असताना त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर पुढे याचा त्यांना खूप फायदा होतो. मोठ्यांशी नेहमी आदराने आणि नम्रपणे बोलावे, खरे बोलावे, ई. तर माझ्यावर देखील माझ्या आई आणि वडिलांनी हे संस्कार केले. त्याचा मला आज खूप फायदा होत आहे.

मे महिन्यातील गोष्ट. उन्हाळी सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही सगळे आमच्या कोकणातील गावी फिरण्यासाठी आणि मजा म्हणून गेलो होतो. त्या वेळी मी फार तर ८ वर्षाचा असेन. पण आई वडिलांनी लावलेली शिस्त फार मोठी होती. भावंडे आणि मी मिळून खेळ, आंबे काढायला आणि त्याचा रस काढायला बसणे, गाणी गप्पा यात केव्हा वेळ जात असे कळतही नसे. मग संध्याकाळी आजीची हाक आली की सगळ्यांनी देवापुढे हात जोडून बसा आणि परवचा म्हणायला सुरुवात करा. मला आधीपासून म्हणात असल्याने येत होते परंतु बाकीच्या काही भावंडाना पाठ नव्हते त्यामुळे आजीने एक युक्ती केली. सगळ्यांनी माझ्या मागोमाग म्हणा असे सांगून एक एक श्लोक आमच्याकडून म्हणवून घेतले. त्या नंतर शांत बसायला सांगून एक प्रकारे योगाच करवून घेतला.

किस्सा जरी छोटा असला तरी त्यात जे वर्म आहे ते म्हणजे शुभंकरोती म्हणण्याचे संस्कार. आजकाल आधुनिक आणि गतिमान युगात कोणालाच वेळ नाही. पण काही झाले तरी आपण आपले संस्कार कधीही विसरता कामा नयेत. संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा, घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन श्लोक म्हणायचे आणि चिंतन करायचे, परवचा म्हणायचा, यात एक वेगळाच आनंद होता. पण काळाच्या ओघात हे दृश्य पाहायला मिळत नाही. शहर आणि गाव या जरी दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी संस्कार कधीही आड येता कामा नयेत.

संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने घरात शुभ आणि अध्यात्मिक लहरींचे प्रमाण वाढते आणि कलह, अशांती दूर होण्यास मदत होते. घंटा वाजवून पूर्ण घरात धूप फिरवला जातो. त्याने घरातील वाईट शक्तींचा नाश होतो. लहानपणी केलेले संस्कार कायम ठेवले तर पुढे जाऊन कधी काही गैर प्रसंग घडला तर वेळीच त्यातून बाहेर पडता येते. माझ्या बाबतीत हे फारच लाभदायक ठरले; कारण आई वडिलांनी वेळीच लहानपणी केलेले संस्कार. 

तात्पर्य असे की कितीही मोठे झालो तरी आपण आपले संस्कार कधीही विसरता कामा नयेत. याच संस्काराच्या बळावर आपण खूप मोठे यश संपादन करू शकतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गो ग्रास :- एक कालवश होणारी संकल्पना

किल्ले कोहोज- एक थरारक आणि रमणीय अनुभव

संवाद लेखन - तो आणि ती