माझ्या गावचा शिमगा

' होळी रे होळी, पुरणाची पोळी ' असा गजर करत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणारा सण म्हणजे शिमगा(होळी). मकरसंक्रांत झाली की सर्वांना वेध लागतात ते होळीचे. वातावरणात हवाहवासा वाटणारा गारवा मन सुखावून जातो. काही ठिकाणी हाच गारवा खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे ते होळीची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. होळी पेटली की त्या पेटत्या होळीने सगळे वातावरण छान उबदार होऊन जाते. प्रत्येक गावात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. याला शिमगा असेही म्हणतात. माझ्या गावचा शिमगा काहीसा वेगळाच आणि आनंद देणारा आहे. आधी माझ्या गावाबद्दल थोडेसे सांगतो.

मी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नांदिवडे या गावचा. कोकण आणि शिमगा हे समीकरण फारच वेगळे आहे. आमच्या गावात हा सण होळी पौर्णिमा ते रंगपंचमी असा साजरा केला जातो. आम्ही सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण यात मुख्य आकर्षण असते ते ग्रामदेवतेच्या पालखीचे. कितीही कामे असली तरी शिमगा न चुकवणारे बरेच जण असतात त्यातलाच मी एक. विस्तीर्ण असा लाभलेला समुद्रकिनारा, नारळ आणि पोफळीच्या लांबच लांब पसरलेल्या बागा, आंब्याची झाडं,  हे सर्व सुख फक्त कोकणातच पाहायला मिळते. भल्या पहाटे उठून गुरांना चरायला सोडणे, अंगण स्वच्छ करणे, सडा संमार्जन करणे, देवासाठी फुले वेचणे, यासारखा आनंद शहरी जीवनात नाही. शिमग्याची सुरुवात होळी पौर्णिमेपासून होते. या दिवशी गावात थोडे जुने झालेले पण बाजूला नवीन रुजलेले असे सुपारीचे झाड वाजत गाजत घेऊन येतात. आम्ही सगळे देखील यात सहभागी होतो. मग दिवसभर गाणी म्हणत आणि उत्साहपूर्ण वातावरणात सायंकाळच्या होळीचा मुहूर्त येण्याची वाट पहात असतात.

याबाबत मी माझी आठवण सांगतो. साधारण दहा वर्ष झाली असतील, मी नेहमीप्रमाणे शिमग्यासाठी मुंबईहून निघून गावाला पोचलो. एक दिवस अगोदर आल्याने साफसफाई करायला घरच्यांना माझा हातभार लागला. सकाळी वरीलप्रमाणे सर्व कामे करून सुपारीचे झाड आणायला गावातील मंडळी आणि मित्रांसमवेत गेलो. येता येता तीन वाजले. घरात सगळी खूप उत्साही आणि आनंदी होती. हा सणच असा आहे. अखेर मुहूर्त जवळ आला. संध्याकाळी सहा वाजल्यापासून आम्ही होळी रचून तयार ठेवली. सात वाजता दिवेलागण झाल्यानंतर नियमित होणारा परवचा म्हणून झाला आणि आजोबांनी होळीची यथासांग पूजा केली. पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला. आणि सर्वांना नमस्कार करायला सांगितले. यात अशी प्रथा आहे की प्रत्येकजण नमस्कार करताना प्रदक्षिणा घालताना होळीमध्ये एक एक नारळ अर्पण करायचा असतो. तो नारळ काढण्याची शर्यत लागायची. मी आधीपासूनच या सर्व प्रकाराबाबत भीती बाळगून असायचो त्यामुळे लांबूनच नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिलो. गावातील काही मुलांनी नारळ बाजूला काढले आणि त्याचा प्रसाद सगळ्यांना खायला दिला. या वेळी सर्वांनी मागणे मागितले की सर्व प्रकारची दुःखे आणि चिंता नष्ट व्हाव्यात. एका प्रकारे मनातील सर्व वाईट विचारांची, हेवेदावे यांची होळी केली. होळी शांत होईपर्यंत वेगवेगळी लोकगीते म्हंटली. मग रुचकर अशी पुरणपोळी आणि साजूक तूप, कटाची आमटी,भात असे स्वादिष्ट भोजन केले आणि दुसऱ्या दिवशी काय करायचे याबाबत आराखडे मनात आखत झोपी गेलो.

दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. खरे तर या दिवसाला धुलीवंदन म्हणायचे कारण की, या दिवशी आदल्या दिवशी पेटलेल्या होळीला शांत करून त्या होळीची राख एकमेकांच्या कपाळी लावून आणि नतमस्तक होऊन शुभेच्छा देतात. तसेच काही वडीलधारी आणि अनुभवी माणसे ही राख आपल्या तिजोरीत ठेवतात. धनाची वाढ होण्यात खूप लाभदायक असते असा त्यांचा विश्वास असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळ्यांनी एकमेकांना राख लावून धुलीवंदन साजरे केले. या दिवशी विशेष काही नसल्याने नेहमीप्रमाणे गप्पा मारत आनंदाने दिवस ढकलला.

तिसरा दिवस म्हणजे पालखीचे आगमन.सकाळी पहाटे उठून संपूर्ण घर स्वच्छ करून अंगणात आजीने छानशी रांगोळी घातली. घरात सनई चौघडाची कॅसेट लावली. दुपारी बाराच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. यथासांग पूजा करून आजीने नैवेद्य दाखवला आणि पालखीसोबत आलेल्या मंडळींना फराळ दिला. फराळ करून पालखी पुढे मार्गस्थ झाली आणि आम्ही त्या आठवणीत दिवस घालवला. ही पालखी खेळवण्याचे आमच्याकडे नसले तरी ती पाहणे हेदेखील एक वेगळेच सुख होते. देवीच्या अंगावरील दागिने सोबत असलेल्या ' गुरवाकडे ' देऊन ती पालखी खूप छान प्रकारे खेळवली गेली. अशा प्रकारे तो दिवस आनंदात पार पडला

चौथा दिवस म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणीच होती. कारण या दिवशी गावात घरोघरी जाऊन ' संकासुर ' आणि सहकलाकार यांचे ' खेळे ' व्हायचे. सकाळपासून आतुरतेने त्यांची आम्ही वाट पाहत होतो. साधारण अकरा वाजेपर्यंत त्यांचे आगमन झाले. अतिशय सुंदर असा पोशाख परिधान केलेले सहकलाकार, संकासुर, गवळण, अशी मंडळी आमच्या अंगणात आली. आजोबांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले आणि खेळे सुरू करण्यास सांगितले. टाळ आणि मृदुंगाच्या तालावर लोकगीते म्हणत त्यांनी उत्कृष्ट असे नृत्य आणि सोंग सादर केले. संकासुराच्या वेशाला घाबरून अनेक लहान मुले घाबरून घरात लपत. पण आम्ही त्यांना धीर देऊन त्यांची भीती कमी करत असू. अखेर आजोबांनी त्यांना सुपारी देऊन त्यांचा योग्य असा सन्मान केला आणि पाठवणी केली. आम्ही हा अमूल्य असा आठवणींचा खजिना हृदयात साठवत आनंदात भोजन करून दिवस घालवला.

यानंतर मध्ये एक दिवस काही कार्यक्रम नसल्याने आम्हाला उत्सुकता होती ती रंगपंचमीची. या दिवशी आम्ही सकाळपासूनच हर्बल रंग म्हणजे गुलाल, हळद, अबीर, यापासून रंगपंचमी खेळत होतो. एकमेकांवर साधे पाणी उडवणे, रंगाने रंगलेली आमची सोंगे पाहून घरातील मंडळी आमच्यावर खूप हसायची. आम्ही देखील आरश्यात पाहून खूप हसलो होतो. मग स्वच्छ अंघोळ करून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला आणि ताणून दिली. संध्याकाळी नियमितपणे परवचा म्हंटला आणि दुसऱ्या दिवशी निघायचे त्यासाठी तयारी करायला लागलो. आई वडिलांना मदत करत असताना एका बाजूला आजी आजोबांकडून गोष्टी ऐकत होतो. दुसऱ्या दिवशी लवकर निघायचे म्हणून जेवण करून पुढील वर्षी याहून अधिक कशी मजा करायची याची मनोस्वप्ने रंगवत झोपी गेलो.

सकाळी नेहमीप्रमाणे उठून फ्रेश झालो आणि आधी देवाला, आजी आजोबांना, मग आई वडिलांच्या पाया पडून रत्नागिरीकडे प्रस्थान केले. शहरी जीवनात कितीही आनंद आणि पैसा असला तरी या सणाला गावाकडे जाऊन जी मजा आणि आनंद मिळतो तो नाही. अशा प्रकारे माझ्या गावचा शिमगा खूप उत्साहपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.

Comments

  1. Apratim.... Gavachi maja kahi orch aste...🙌🙌😍😍😍😍😍❤❤😊😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गो ग्रास :- एक कालवश होणारी संकल्पना

किल्ले कोहोज- एक थरारक आणि रमणीय अनुभव

संवाद लेखन - तो आणि ती