संस्कारधन आणि मी
' शुभंकरोती कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दिपोज्योती नमोस्तूते ' तिन्हीसांजा झाल्या की गावाकडे वडीलधाऱ्या मंडळींची आणि घरातील स्त्रियांची देवाजवळ दिवा लावण्याची लगबग सुरू होते. देवासमोर निरांजन लावून सर्वांनी एकत्र बसून शुभंकरोती म्हणणे हा एक नियमच होता. अर्थात त्यामागे खूप सुंदर अर्थ होता. तिन्हीसांज ही अशी वेळ आहे की त्यावेळी श्री लक्ष्मीचा संचार असतो. अशा वेळी तिची आराधना आणि चिंतन करणारी घरे दिसली की तिचा वरदहस्त कायम त्या घरावर राहतो. लहान मुले ही खूपच संवेदनशील आणि अनुकरण करणारी असतात. त्यांच्यात आकलनशक्ती आणि पाठांतर करण्याची क्षमता तुलनेने मोठ्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे लहान असताना त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर पुढे याचा त्यांना खूप फायदा होतो. मोठ्यांशी नेहमी आदराने आणि नम्रपणे बोलावे, खरे बोलावे, ई. तर माझ्यावर देखील माझ्या आई आणि वडिलांनी हे संस्कार केले. त्याचा मला आज खूप फायदा होत आहे. मे महिन्यातील गोष्ट. उन्हाळी सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही सगळे आमच्या कोकणातील गावी फिरण्यासाठी आणि मजा म्हणून गेलो होतो. त्या वेळी मी फार तर ८ वर्षा...